5.8.09

ती आणि घर

लांबच्यालांब सुट्टीवरून परत येताना तिला कधीचेच घराचे वेध लागलेले असतात. एकदा घरात जाऊन पडलं की झालं असं स्वतःलाच समजावत ती लिफ्ट्पाशी येते. रात्रभराचा प्रवासाचा थकवा सगळ्या हालचालीतून जाणवणारा. रोज न ऐकू येणारा पहाटेचा अलार्म कुठेतरी वाजतो आहे. कुलुप काढता काढता तिला आठवतं की भाजी फ्रिजमध्ये तशीच राहिलेली. इस्त्रीचे कपडे जाताना टाकलेले ते आता आणावे लागतील.

खरंतर या सुटीच्या आधी सगळ्या सगळ्याचाच कंटाळा आलेला तिला. रोज उठून आवरायचा, धडपडत ऑफिस गाठायचा, परत आल्यावर पसरलेल्या घराचा इतकंच नव्हे तर खिडक्यांना लावलेल्या पडद्यांचा पण. तरीही आता घरात शिरताना तिच्या नजरेत फक्त माया असते. स्वतःच्या घरात आहोत या जाणिवेचं उबदार अस्तर बाकी सगळ्या भावनांना लपेटून टाकतं. मग ती कितीही थकलेली असूनही कामाला लागते. अस्ताव्यस्त पसरलेल्या घरातून तिचं अस्तित्व शोधते.

तिच्या नसण्यानं रुसलेलं घर पण हळूहळू मूड्मध्ये येतं मग. किती दिवसात गॅलरीत बसून चहा प्यायला नाही हे तिला आपोआपच जाणवतं. कपाटं आवरताना कधीचं आणून ठेवलेलं कवितांचं पुस्तक सापडतं तेव्हा ती कसली खुशीत येऊन तिथेच ठाण मांडते. खिडकीतून गुलमोहराची एक फांदी अलगद हाताला लागेल अशी आलिये हे तिला आत्ताच दिसतं. आपल्याच घरात ती परत नवीन होऊन जाते मग. स्वतःलाच आठवत साठवत रहाते तिथल्या प्रत्येक खुणेसरशी. पहिल्यांदा मोगरा फुलला तेव्हा कशी ती पण बहरून गेलेली. आवरून झाल्यावर चहा घ्यायला ती कशी एका ठरावीक ठिकाणी बसायची जिथून बाहेरची वर्दळ दिसायची पण त्याचा त्रास नाही व्हायचा. मावळत्या संध्याकाळी 'भय इथले' ऐकताना कशी कावरीबावरी झालेली ती देव्हार्‍यासमोर बसून अथर्वशीर्ष म्हणत शांतावलेली. सार्‍या सार्‍या घरात फक्त तिचा सडा..

रोजच्या जगण्यातून हे सगळं विसरून गेलेली होती ती. छोटे छोटे आठवणींचे आणि स्वप्नांचे तुकडे. आषाढातला मुसळधार पाऊस पडत असताना खुर्चीत गोधडीत बसून आल्याचा चहा प्यायचं स्वप्न. कुमारांचं उड जायेगा ऐकता ऐकता बैठकीवर ओणवं पडून पुस्तक वाचायचं स्वप्न. कुंडीतल्या ब्रह्मकमळाला एकसाथ फुलं यावीत आणि त्यावेळी चंद्राच्या प्रकाशात तिथंच रात्रभर बसून रहावं.. कितीतरी स्वप्नं.. आठवणी आणि स्वप्नांची सरमिसळ झालेली. घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जडलेल्या आठवणींची की आठवलेल्या स्वप्नांची. कुणा तिसर्‍याला वेडगळ वाटणारी पण तिच्या घरात रुजून गेलेली बावरी ती आणि तिची स्वप्नं.

4 comments:

Nayana Kulkarni-Dongare said...

Good one! Khoop touchy writing ahe.

ओहित म्हणे said...

"सार्‍या सार्‍या घरात फक्त तिचा सडा.."

मस्तच होतं हे. कसं असतं ना. दूर गेल्यानं जवळच्याच जवळपण कसं दृढ होतं! घर वगैरे गोष्टी तर रोजच्याच ... कधीच लक्ष नाही देत आपण. पण किती सामावलेलो असतो आपण त्यातच!

Harish said...

Job mule parents pasun dur rahnaryanchya feelings pratibimb.....!



Mast jamlay......!

Monsieur K said...

mast lihila aahes!
navin varshaachyaa shubhecchhaa :)