9.4.09

Father and Daughter

ती सायकलवरून चाललेली दोघं. बहुतेक नव्यानेच सायकल शिकलेल्या छोटीची बाबाच्या बरोबरीनं नाहीतर त्याच्या पुढं सायकल नेण्याची धडपड चाललीये. पण बाबा तिच्याबरोबर आस्ते आस्ते चाललाय. टेकडी आल्यावर दमछाक झालिये तिची. पण उत्साह तितकाच. वरती झाडांशेजारी सायकल टेकवून ती समोरच्या नदीकडं पहाताना गुंगुन गेलिये. पण इतक्यात बाबा नदीपाशी गेला सुध्धा. पण नावेकडे जायच्या आधी परत आला तो. छोटीला उचलून निरोप घेतला. किनार्‍यावर बांधलेली नाव सोड्वून त्यानं वल्हवायला सुरुवात केली. छोटी बघतीये सारं. तिच्या डोळ्यात कदाचीत प्रश्नांचं काहूर. जसजशी नाव दूर चालली तशी ती अधिकाधिक अस्वस्थ. पाय उंचावून बाबाला नजरेच्या ट्प्प्यात ठेवतीये ती. अंधारायला लागल्यावर मात्र सायकल घेऊन एकटीच निघाली . येतानाचा उत्साह मावळून गेलाय आता परत जाताना.


परत ती आली बाबाची नाव शोधायला. आल्यावर झाडाशेजारी उभारून बाबाची तासंनतास वाट पहायचा तिचा नेम चुकला नाही. वादळ- वार्‍यात , पानगळीत , पावसात.. ती येत राहिली. आता तर तिला टेकडी चढायला वेळपण लागायचा नाही फारसा. आपले खांद्यावर रूळणारे केस सावरत ती येऊन थांबायची तिथे. त्या जागेशी असलेलं तिचं- स्वतःचं नातं तिलाच ठाऊक.. बाबा असता तर तिनं कित्ती किती गोष्टीं-गुपितं सांगितली असती..शाळेचा पहिला दिवस.. पहिली मैत्री.. बाबानं पोटाशी धरून कुरवाळलं असतं पहिलंवहिलं बक्षिस मिळल्यावर.. आशा आणि निराशेच्या खेळात आपणच आपली समजूत काढत रहात ती थांबायची. मग तिला मैत्रिणी मिळत गेल्या. रोजचं येणं कमी-कमी होत गेलेलं.कधीतरी भटकंती करताना आलीच तिथं तर मात्र क्षणभर का होईना थांबून जायची. 'बाबा इथेच कधीतरी भेटेल' अशा भाबड्या आशेवर 'बाबा परत न येणार्‍या जगात गेलाय ' हा व्यावहारिक शहाणपणा वरचढ ठरत गेला असेल का वाढ्त्या वयानिशी?


आयुष्याच्या नाजूक वळणावर मग तो आला. त्याच्यामागं बसून जातानाही तिची नजर झाडांच्या पलीकडे शोधत रहायची. रोजच्या रामरगाड्यात बाबाला रोज आठ्वायला वेळ तरी कुठं होता? पुढं मग ती मुलांना घेऊन यायला लागली. नदीकाठच्या हिरवळीवर बसून मुलांना खेळतानाही शोधाची एक छ्टा जिवंत होती का निरागस आठवणींचा कप्पा अलगद उघडून हरवून जायची ती? शेवटची आली ती तेव्हा हळूहळू सायकल ढकलत आणलेली . तिच्या सगळ्या प्रवासाची सायकलपण साक्षीदार, तिनं पण साथ सोडली. पण आता सूर्य मावळतीला आलाय. संध्याकाळ्च्या सावल्या जाणवत आहेत, तेव्हा पुन्हा एकदा बाबाला भेटायला आलीये ती. समोरच नदीचं वाळवंट पसरलेलं. किनार्‍यावरच्या वाळूत चालत जाताना तिला तीच नाव दिसते... तिच्या बाबानं नेलेली.आता वाळूत अडकलेली.. त्या जुन्या नावेला कुरवाळत राह्ते ती, जणू जुनी सखी भेटलीये. 'कुठं हरवली होतीस गं बयो? जगण्याच्या रखरखाटात आली असतीस तर..' बाबाच्या कुशीत जितकी शांतपणे पहुडायची तशी ती नावेपाशी पोटाशी पाय घेऊन पड्लीये आता ती. नावेशी गुजगोष्टी करत. आयुष्यभराची शोधयात्रा डोळ्यासमोर सांडलेली. सगळ्या लहानपणच्या गोष्टींना रंग चढलाय... मग इतक्यात तिला तिचे बाबा दिसला.. जाताना होता तसाच, हसर्‍या डोळ्यांचा. मधली सारी वर्षं उडून गेली आता. आणि त्याची चिमुरडी त्याला घट्ट मिठी मारून किलबिल करायला लागलीये.


प्रत्येक वळणावर मागच्या स्मॄतींचा गुंतलेला धागा आणि समाधानी वाटचालीला लागलेलं हुरहुरीचं एक हलकसं गालबोट. आयुष्यातली शोधयात्रा कशी मांडायची जमा-खर्चाच्या रकान्यात? न मिळालेल्या प्रश्नांना जपून ठेवत की नको असलेलं सत्य समजूतींच्या आड दडवत.. नात्यांचा हा चिरंतन शोध.. .


Father and Daughter(२०००)मायकेल डुबोट द विट - अ‍ॅकेडॅमी अवार्ड विनर अ‍ॅनिमेशन फिल्म

29.6.08

कभी फुरसत से कर लेना हिसाब..

आजचा पॅमचा आमच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस. तिला कळू न देता तिच्या फेअरवेल पार्टीची सगळी तयारी करण्याची आमची धडपड. दुपारी मीटिंगच्या निमित्ताने तिला रूममध्ये बोलावून मस्त सरप्राईज दिलं तेव्हा खुललेला तिचा चेहरा. आधी 'काय शेवट्च्या दिवसापर्यंत कसल्या मीटिंग आणि कसलं काय..' असा भाव ते एकदम सगळ्यांना बघून आश्चर्य ते मग एकदम दिलखुलास हसणारी पॅम.. अवघ्या पाच मिनिटात काय वेगवेगळी दिसली. आधी तिला शुभेच्छा , तिच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव असं सगळं झाल्यावर मोर्चा खाण्यावर वळला. हळुहळु लोक पांगायला लागले, तसं निरोप घ्यायची वेळ जवळ येतेय असं तिलापण जाणवलं.
निरोप घ्यायचाय, निघून सोडून जायचंय, वैताग झालाय असं सगळे कधी ना कधी तरी म्हणत असतोच, तशीच तीही. पण निरोप घ्यायची वेळ विचित्र होते.. म्हणजे हे आताच जे होतं त्यातलं थोडं हवंय, खरंतर तसं बरंचसं बरं पण आहे, नवीन ठिकाणी जाऊन सगळं नव्यानं सुरू करण्यापेक्षा हे ठिकाय, पण तरीही नव्याची ओढ आहे. आतापर्यंत केलेली मनाची तयारी, वाईट न वाटून घेता 'हे फक्त आता वाटतंय, परत आपल्या देशात गेलं की आठ्वणार पण नाही' अशी हजार मन रमवणारी उत्तरं दिली तरी निरोप घ्यायचा तो एक क्षण काही चुकत नाही. त्याची तीव्रता , त्यातलं दु:ख आहे ते आहेच. सगळं तिच्या डोळ्यात साठून आलेलं आणि ती ते थांबवायच्या प्रयत्नात.. असल्या वेळी काय काय बोलायचं असतं त्यातलं काहीच नाही बोलता येत, म्हणजे 'बयो, तू येवढ्या चिकाटीनं काम करतेस गं' किंवा ' अगं मला तुझ्याकडून हे शिकायचं होतं बघ..' असलं काही-बाही बोलावंसं वाटत असताना मला काहीच बोलता नाही येत. आली वेळ फक्त निभावून न्यायची झालं.
पण आत्ता पॅम काय विचार करत असेल.. वर्षा-दोन वर्षापूर्वी इथं येताना पोटात कशी फुलपाखरं फडफडलेली त्याचा की परत गेल्यावर काय काय गोष्टी मिस केल्या त्या करायचा की इथं कसा त्रास झाला आणि कसंकसं त्यातून सांभाळलं त्याचा..
नव्या शहरात येऊन मुळं रुजवताना आधीची पायधूळ कशी जपतात माणसं.. खरं माणसांचं आणि शहरांचं काय नातं असतं? अनोळख्या शहरात ओळखीच्या पायवाटा सापडत जातात की कुणीतरी अज्ञात मुसाफिरानं त्या आधीच मळवलेल्या असतात्..की आपल्या माणसांबरोबर शहरंपण ओळखीची वाटायला लागतात.. नक्की काय? यातलं कितपत काय बरोबर असे हिशोब तरी कसल्या आधारानं मांडतात लोक.. पूर्वानुभवांच्या की कधी मनात आलेल्या क्षणीक विचारांच्या लाटेवर स्वार होत... माहीती नाही..
कुठल्यातरी ओढीनं मजल- दरमजल करत उचललेली पावलं वळणं पार करत एका ठिकाणी थबकतात तेव्हा त्याना प्रत्येक वेळी बरोबर वाटेवर चालल्याचा थोडाच भरवसा असतो? पण तरीही माणसं हिशेब करतात, वाटा शोधतात आणि ' मुझ को पेहचानती है कहां मंझिले' म्हणत चालत रहातातच. कदाचीत वाटांची भूल कदाचित मंझिलांची ओढ..

काही नसलं तरी हातात रहातातच, गुंतलेले क्षण आणि निरोपांचे अश्रू..